Actor Krishna Abhishek reacts: ‘इंडस्ट्रीमधील उडणारे लोक आता शांत झाले आहेत…’

लोक आता स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देत आहेत. मी काही कलाकार पाहिले जे मानसिक आरोग्याची खिल्ली उडवायचे. डिप्रेशनमध्ये असलेल्या कलाकारांवर शेरेबाजी करायचे.

एमपीसी न्यूज – मागील सुमारे अडीच महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. जणूकाही हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने या प्रकरणी रोज उलटसुलट अंदाज बांधले जात आहेत. मात्र अनेक हे प्रकरण सीबीआयकडे दिल्यानंतर अनेक धक्कादयक खुलासे होत आहेत. या प्रकरणावर आता अभिनेता कृष्णा अभिषेक याने प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमधील काही लोक आधी खूप उडत होते, पण आता शांत झाले आहेत. असा उपरोधिक टोला त्याने लगावला आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, ‘सुशांत एक उत्तम कलाकार होता. त्याच्यासारख्या गुणी कलाकाराचा इतक्या कमी वयात मृत्यू होणं ही एक दुदैवी घटना आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यावर आता गांभीर्याने चर्चा केली जातेय.

लोक आता स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देत आहेत. मी काही कलाकार पाहिले जे मानसिक आरोग्याची खिल्ली उडवायचे. डिप्रेशनमध्ये असलेल्या कलाकारांवर शेरेबाजी करायचे. पण आता ते देखील जमिनीवर आले आहेत. इंडस्ट्रीमधील काही लोक खूप उडत होते, आता शांत झाले आहेत’.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश माने शिंदे यांच्यामार्फत केला.

रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासदेखील ती तयार असल्याचे अ‍ॅड. माने शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.