Kundmala Bridge : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
एमपीसी न्यूज – इंदोरी कुंडमळा या गावातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील साकव पूल (Kundmala Bridge) हा दळणवळणाच्या दृष्टीने अडचणींचा ठरत आहे. परिसरातील अनेक गावांना सोयीचा मार्ग या पुलामुळे गैरसोयीचा होत आहे. याबाबत भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पूल बांधण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विभागाला पुलाच्या कामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भेगडे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.
इंदोरी कुंडमळा या गावातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील असणारा साकव पूल (Kundmala Bridge) हा दळणवळणाच्या दृष्टीने अडचणींचा ठरत आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना या पुलावरुन शेतीमालाची तसेच दुग्ध पदार्थांची वाहतूक करावी लागते. परंतु हा साकव पूल असल्याने यावरून फक्त पायी चालणारे, आणि मोटारसायकलला जाता येते.
सध्या अस्तित्वात असलेला साकव पूल 30 वर्षांपूर्वी दिवंगत खासदार आण्णा जोशी यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला होता. शेजारील 10 ते 12 गावांच्या वाहतुकीचा हाच प्रमुख मार्ग आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हा पूल (Kundmala Bridge) अपुरा पडत आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीसाठी येथील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्याचबरोबर कामगारवर्ग, नोकरदारवर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थीनींना या अडचणीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे प्रसिद्ध कुंडदेवी मातेचे मंदिर आहे त्यामुळे नेहमीच या मार्गावर भाविकांची वर्दळ असते.
तसेच या पुलाचे काम झाल्याने तळेगाव-चाकण रस्त्यावरील तळेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही प्रमाणत मार्गी लागण्यास मदत होणार आहे त्यामुळे येथे नवीन पूल उभारण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती.
याच संदर्भात, भारतीय जनता पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती.
त्यावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्ते विकास सचिवांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याने लवकरच नवीन पुलाचे काम मार्गी लागेल, असा विश्वास भेगडे यांनी व्यक्त केला.