Budget 2024 : भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ – सुनील देवधर
एमपीसी न्यूज : भारताचा अमृतकाळ (Budget 2024) हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ असून, 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आत्मविश्वासाने सर्वांना सोबत घेऊन काम करत असल्याचा विश्वास भाजप नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पावर ते बोलत होते.
यंदाचा हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असला तरी सर्वसमावेशक व नावीन्यपूर्ण आहे. जुलैमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठीचा संपूर्ण रोडमॅप मांडण्यात येईल.
विकासाचा विचार करताना देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी याच चार घटकांवर लक्ष केंद्रीत असून, त्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी म्हणाले आहेत. या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या आणि त्यांना केंद्रस्थानी ठेऊन लागू करण्यात आलेल्या अनेक योजनांमुळे मागील दहा वर्षांच्या काळात देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे, असेही देवधर यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे कोणत्या चार घटकांच्या उत्थानासाठी काम करायचे आहे, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ते घटक म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. हरित व सर्वसमावेशक विकासावर (Budget 2024) भर असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळातील गेली 10 वर्षे परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगून या काळात भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करत आहे.
पंतप्रधान मोदींजींच्या कार्यकाळातील गेली 10 वर्षे परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगत या काळात भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करत आहे. २०१९ मध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3.1 लाख कोटी रूपयांच्या तरतूदींपासून सुरू झालेली ही विकास यात्रा 2023-24 मध्ये विकसित भारताचं स्वप्न घेवून ११.११ लाख कोटी रुपयांचा तरतुदीपर्यंत पोहचली आहे. आणि याच बळावर ही विकास यात्रा 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात साकार करेल. असा विश्वासही देवधर यांनी व्यक्त केला आहे.