Mumbai: राज्यात नवे 771 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 541, मृतांचा आकडा 583 वर

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोनाच्या नवीन 771 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. राज्यात आज 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 583 झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात एकूण 2 हजार 465 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. बऱ्या झालेल्या या सर्व रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. 

मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा – मुख्यमंत्री

अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा. पण, अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सूरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे.

ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.