Mumbai: राज्यात नवे 328 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 3,648, मृतांची संख्या 211 वर
कोरोना बाधित ३६५रुग्ण बरे होऊन घरी
एमपीसी न्यूज – राज्यात आज (शनिवारी) 328 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 3,648 झाली आहे. आज दिवसभरात 34 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 365 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 3,072 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज राज्यात 11 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 211 झाली आहे. (या पूर्वी 11 एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटीव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यू मधून वगळण्यात आला आहे.) आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील 5 आणि पुणे येथील 4 तर 1 मृत्यू औरंगाबाद मनपा आणि 1 मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात 6 पुरुष तर 5 महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील 5 रुग्ण आहेत तर 6 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 9 रुग्णांमध्ये (82 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 67 हजार 468 नमुन्यांपैकी 63 हजार 476 जणांचे कोरोना करता निगेटीव्ह आले आहेत तर 3,648 जण पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 82 हजार 299 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6,999 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.