Nigdi: वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व्यापक प्रणाली राबविण्याची सतीश कदम यांची मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित राखण्यासाठी व्यापक प्रणाली राबविण्याची मागणी डॉ. बी. आर आंबेडकर ग्रुपचे सतीश कदम यांनी केली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कदम यांनी म्हटले आहे, शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊन एक वर्षे झाले. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, बलात्कार यामुळे सर्वत्र असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याने जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे.
- शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असुन नागरीभाग आणि एमआयडीसी असा संमिश्र परिसर असल्याने भाईगिरी वाढली आहे, घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार, फसवणूक, वाहनांची तोडफोड, खून, खूनाचा प्रयत्न, आदी गंभीर गुन्हयांचे प्रमाण वाढले आहे.
शहरात गेल्या आठ महीन्यात तब्बल ३५ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील बहुसंख्य घटना दिवसाढवळ्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. खुनाच्या घटनांसह चोरी, लूटमार, वाहनांची जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. खुन,दरोडे, चो-या, चेन स्नॅचिग, अनैतिक व्यावसाय, जुगार, गटागटामध्ये संघर्ष वाढत असल्याने खुनाचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून केल्या जाणा-या उपाय योजना तोकड्या पडत असल्याचे वास्तव आहे, असे कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.