Pimpri : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस ; उमेदवारांची लगबग तर इच्छुकांची घालमेल
एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवार म्हणून नवे जाहीर झालेल्या महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि. ३) दाखल केले. आज काही बंडखोर उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. परंतु ज्या इच्छुकांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत त्यांच्या जीवाची मात्र घालमेल सुरु आहे. बंडखोरी होण्याच्या भीतीने नाव जाहीर न केलेल्या काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे.
मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये बंडाळी शिगेला पोचली असून डावलले गेलेल्या काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी चक्क पक्ष बदलून दुसऱ्या पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अजूनही काही इच्छुक तिकीट मिळण्याच्या आशेवर असून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करून बसले आहेत. परंतु, पक्षाकडून नाव जाहीर होत नसल्यामुळे त्यांच्या जीवाची घालमेल सुरु आहे. बंडखोरी होण्याच्या भीतीने नाव जाहीर न केलेल्या काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे इकचुक उमेदवारांना ऐनवेळी बंडाळी देखील करता येणार नाही. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत.