Sushma Andhare : नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळले – सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे घेतलेल्या मेळाव्याची अक्षरशः चिरफाड केली. याच मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपने त्यांचा समाचार घेतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले होते. याच मेळाव्यातून त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग देखील फुंकले आहे. यावरच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंचा वारंवार उल्लेख केला. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तर नारायण राणे यांचे मानसिक संतुलन ढासळले असे म्हणत राणे यांच्यावर टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मुंबईत झालेला शिवसेनेचा मेळावा इतका धडाकेबाज झाला की त्याचे परिणाम दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या मेळाव्याचे उत्तर द्यावे लागले. नारायण राणे यांचे पुनर्वसनच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याच्या बोलीवर झाले आहे. भाजपमध्ये काही काम केलं नाही तरी चालेल मात्र उठताना बसताना प्रत्येक वेळी उद्धव उद्धव जप त्यांनी केला पाहिजे या एका अटीवरच ते भाजपमध्ये आहेत, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.

आधीच त्यांच्या बंगल्याबद्दलचा कोर्टाचा निर्णय आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या कधीही त्यांच्या बंगल्यावर हातोडा घेऊन पोहोचतील. त्यांचा हातोडा भाजपने अडवून धरावा यासाठी नारायण राणे माध्यमातून गरळ ओकत आहेत. नारायण राणे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यांना तत्काळ उपचाराची गरज आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राणे यांची खिल्ली उडवली.

Shivsena Crisis : शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडतंय; शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.