Railway Flyover Kanhe : कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन
एमपीसी न्यूज – कान्हे – टाकवे मार्गावर प्रस्तावित असलेला रेल्वे उड्डाणपूल (Railway Flyover Kanhe) झाल्यास 164 व्यावसायिक गाळे उद्धवस्त होत असून यामुळे सुमारे 250 कुटुंब बाधित होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा या उड्डाणपुलास विरोध आहे. याबाबत भाजपाचे मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. हा रेल्वे उड्डाणपूल स्थलांतरित करा, अशी त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनातून मागणी केली आहे. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे विभागास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा कान्हे उड्डाणपूल (Railway Flyover Kanhe) आता कान्हे ग्रामस्थांच्या घरावर आणि व्यावसायिक इमारतींवर घाला घालणारा ठरत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून हा पूल इतरत्र स्थलांतरित केला जावा अशी आक्रमक मागणी केली जात आहे.
कान्हे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील कान्हे-टाकवे मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल झाला तर कान्हे गावठाण हद्दीतील टाकवे रस्त्यावरील 164 व्यवसायिक गाळे उदवस्त होत असून यामुळे जवळपास 250 कुटुंब बाधित होत असून ही कुटुंबे उघड्यावर येत आहेत त्यामुळे हा संभाव्य रेल्वे उड्डाणपूल स्थलांतरित करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
यावेळी रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली.
यावेळी बोलताना भेगडे म्हणाले की, “कान्हे गाव संपूर्ण आंदर मावळचे प्रवेशद्वार आहे शिवाय पलीकडे कान्हे – टाकवे MIDC देखील आहे त्याकरता रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. परंतु उड्डाणपूल कान्हे ग्रामस्थांवर अन्यायकारक न ठरता पर्यायी मार्गांवरून करण्यात यावा अशी ग्रामस्थांची व आमची मागणी आहे.”