Maval News: आमदार सुनील शेळके यांच्या मागण्या म्हणजे मारुतीचे शेपूट – अजित पवार

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागण्या मारुतीच्या शेपटासारख्या असतात, कधीच संपत नाहीत. आणि हा हरहुन्नरी पठ्ठ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पिच्छा सोडत नाही, या शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. 

मावळ तालुक्यातील प्रशासकीय इमारतींबरोबर 300 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ( दि.20) करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

मावळच्या जनतेने सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार विक्रमी मतांनी निवडून दिला. मावळच्या जनतेने माझे ऐकले, त्यामुळे आता मला मावळच्या आमदाराचे ऐकावेच लागते. मावळच्या विकासाला निधी कमी पडू न देण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

दरम्यान कार्यक्रमाला मावळमध्ये आल्याचे समाधान व्यक्त करत ह्या विकास कामांचा दर्जा चांगला असावा आणि या निधीचा योग्य उपयोग व्हायला हवा कारण हा जनतेच्या घामाचा पैसा आहे, असे म्हणत पवार यांनी मावळवासीयांना आश्वासित केले.

या कार्यक्रमासाठी आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके, मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव,नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, नगरसेवक गणेश खांडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

तसेच गणेश काकडे, तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हापरिषद सदस्या शोभा कदम, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, अंकुश आंबेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, सुनील दाभाडे, गणेश आप्पा ढोरे, तसेच तळेगाव, लोणावळा, देहूरोड कामशेत शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,तळेगाव, लोणावळा नगर परिषदेचे, वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक, नगरसेविका तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सदस्या,विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मला कधीच निधीसाठी रिकाम्या हाताने मागे पाठवलं नाही आणि दादा, तुम्ही दिलेला पैसा जनतेच्या सत्कर्मी लावीन, इतकंच नाही तर नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती यावेळी राष्ट्रवादीमय करून दाखवू”, असा विश्वास शेळके यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या भाषणाआधी गुलाब वरघडे, रामनाथ वारींगे, अरुणा पिंजण, संतोष जांभुळकर, पंढरीनाथ ढोरे, अजिंक्य टिळे, मयूर ढोरे, किसन वहिले, संजय बाविस्कर, गोकुळ किरवे, विलास कुटे आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.

आमदार निलेश लंके, धनंजय मुंडे यांनी दमदार भाषण करत आमदार सुनील शेळके यांना अभिष्टचिंतन करत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, या कार्यक्रमाला मावळात आलो याचे मला खूपच समाधान आहे, आजच्या एवढा मोठा उत्साह कधीच नागरिकांमध्ये या आधी दिसला नाही, असे म्हणत अजित पवारांनी भाषणाला सुरूवात केली.

भाषणादरम्यान पवार यांनी धनंजय मुंडे, निलेश लंके, सुनील शेळके यांना तीन हिरे असल्याचे संबोधत त्यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक केले. पवार म्हणाले, आपण नवीन रोज काहीतरी शिकले पाहीजे, त्यात संकुचित न राहता काम करायला हवे. सरकार चालवताना अनेक संकटे आली, त्यामध्ये कोरोना, वादळ, पुर आले, असे असताना आघाडी सरकार जनतेच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणे हे आद्य कर्तव्य, संस्कृती आहे असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा दिली.

विकास निधीविषयी बोलताना पवार पुढे म्हणाले, आमदार निधी वाढवून 4 कोटी केला आहे त्यामुळे ह्या विकास कामांचा दर्जा चांगला असावा. या निधीचा योग्य उपयोग व्हायला हवा कारण हा जनतेच्या घामाचा पैसा आहे. विकास करताना कोणाला वा-यावर सोडता येणार नाही, त्यामुळे काम करायची असतील तर सुनील शेळके यांनी केलेल्या कामांप्रमाणे सगळी कामे उत्तम प्रकारची असावी असे म्हणताना त्यांनी आमदार शेळकेंच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले. विकासकामांविषयी बोलताना त्यांनी कामशेत पुलाबाबत मिश्किल टिपणी सुद्धा केली.

एकीकडे पेट्रोल, गॅस, डिझेल किंमती वाढल्यामुळे जगणं मुश्किल झाले आहे. अच्छे दिन येणार होते. काय झाले? असे म्हणत पवार यांनी दिल्लीश्वराना मिश्कील शैलीतून चपराक दिली. या संकटकाळात सुद्धा विकास कामे करताना कायद्याच्या चौकटीत बसून काम करायचे आहे आणि त्यासाठी तरुणाईला पुढे येण्याचे आवाहन करत या सळसळत्या रक्ताचा चांगल्या कामात उपयोग करा, असे पवार यांनी भाषणादरम्यान सुचवले.

अखेर भाषणाचा शेवट करताना आमदार सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवसानिमित्त जमलेल्या नागरिकांना साष्टांग दंडवत घालत पवार यांनी भाषण संपवले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल राऊत व बी के कोकाटे यांनी केले. आभार ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.