Talegaon Dabhade News : मुलींनी उच्चशिक्षित व्हावे, हीच ‘सावित्रीमाईंना’ खरी श्रद्धांजली – डॉ. संभाजी मलघे
एमपीसी न्यूज – आज सर्वच क्षेत्रात उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढते आहे आणि ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. शिक्षणामुळे सक्षमीकरणाच्या टप्प्यावर आजची स्त्री जगात खूप पुढारलेली आहे, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. मावळातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मलघे बोलत होते.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध विभागांचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुलेंनी ‘सावित्रीमाई’ हे बिरुद सार्थ ठरवत आपल्या लेकींना समाजात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून शिक्षणाचा वसा दिला हे मोठे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्याचा परिणाम म्हणून आज उच्चविद्याविभूषित मुलींचे प्रमाण सर्वच क्षेत्रात वाढले आहे असे गौरवोद्गार प्राचार्य मलघे यांनी आपल्या भाषणात काढले. पुणे विद्यापीठालाही सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरली असल्याचे मलघे म्हणाले.
Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण
‘सावित्रीचा रस्ता मोठा त्यावर चालणार नेकी, मानवतेच्या सुखासाठी लढणार आम्ही सावित्रीच्या लेकी’ ही आपली स्व रचित कविता सादर करून प्राचार्य मलघे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचे जागरण केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आणि महिला प्राध्यापकांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी विभागाचे प्रा. सत्यजित खांडगे यांनी सूत्रसंचालन केले. इतिहास विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी आभार मानले.