Pune News : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे शिक्षण महत्त्वपूर्ण – सुशीलकुमार शिंदे

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे राजीव गांधी ई–लर्निंंग स्कूलच्या माध्यमातून जात, पात, धर्म न पाहता विद्यार्थ्यांना उत्तम CBSC चे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते आणि या मुलांचे भवितव्य घडवले जाते, ही अतिशय समाधानाची बाब आहे, असे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज इथे काढले. पुणे महानगरपालिकेचे राजीव गांधी ई – लर्निंग शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, समाजामध्ये जिद्द असणे सर्वात महत्त्वाचे आहे. जिद्द व दृढसंकल्प असेल तर यश निश्चित येते, मी दहावी परीक्षेमध्ये अपयशी झालो तरी खच्ची झालो नाही, मी प्रयत्न पूर्वक शिक्षण घेतले. दहावी उत्तीर्ण झालो एवढेच नाही तर पुढे पदवीधर होऊन पुढे वकिली ही पूर्ण केली, परीस्थितीशी झगडून पुढे जाणे हे प्रत्येकाने शिकले पाहिजे. त्यासाठी माझे ‘एका संघर्षाची वाटचाल’ हे चरित्र आहे हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे, असे अवाहन त्यांनी शेवटी केले.

अध्यक्ष स्थानी जेष्ठ गांधीवादी विचारवंत कोंग्रेसचे नेते उल्हास पवार होते. या प्रसंगी पुणे मनपा कोंग्रेस पक्ष गटनेते व राजीव गांधी ई – लर्निंग शाळेचे प्रवर्तक आबा बागुल यांनी स्वागतो प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे आमच्या पिढीचे रोल मॉडेल आहेत. त्यांनी जीवनात अतिशय संघर्ष करून मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशी मोठी पदे भूषवून देशाला दिशा देण्याचे मोठे काम केले, त्यांचा आदर्श हा सर्वच विद्यार्थ्यानी घेण्यासारखा आहे. जात, पात, धर्म, गरीबी, श्रीमंती असा भेदाभेद मनात न मानता केवळ जिद्दीने व मेहनतीने त्यांनी मिळवलेले यश आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील, त्यांचे मार्गदर्शन दहावीतील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी ते आले हे आपल्या विद्यार्थ्यांचे भाग्यच आहे असे मी मानतो. असे ते म्हणाले.

उल्हास पवार यांनी या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, सुशीलकुमार शिंदे यांच्या बरोबर आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, गावोगावी कार्यकर्त्यांशी आपलेपणाने विचारपूस करणे, कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि कोंग्रेस संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले हे सुशीलकुमार शिंदेंनी जणू जीवन व्रतच मानले होते. ते मुख्य मंत्री झाले केंद्रीय गृह मंत्री झाले राज्यपाल झाले तरी गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणा करिता त्यांना शिक्षण मिळावे यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले.

त्यांचे जीवन हेच सर्वांना एक आदर्श जीवन आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा ही अभ्यास करावा असे ते म्हणाले, या प्रसंगी आयोजक आबा बागुल, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, द.स.पोळेकर, चंद्रशेखर पिंगळे, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, विश्वास दिघे, गोरख मरळ आदी उपस्थित होते. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. अमित बागुल यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.