Alandi : विस्थापित झालेल्या नागरिकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ. जगदीश शिंदे
एमपीसी न्यूज – आळंदी मराठवाड्यातून नोकरीसाठी पुणे व इतरत्र ठिकाणी विस्थापित झालेल्या नागरिकांना मूळ प्रवाहात आणणे व त्यांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. त्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असे मत डॉ. जगदीश शिंदे यांनी आळंदीत केले. नोकरी निमित्ताने पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात आलेल्या परभणी, पाथरी येथील भूमिपूत्रांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन आळंदीतील सुयश मंगल कार्यालयात केले होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी डॉ. अनु गायकवाड, माउली हारकळ, उद्द्योजक शिवकुमार बायस, पांडुरंग महाराज शितोळे, अभिजित कदम, अशोक महाराज धीदुरे, डॉ. प्रशांत सासवडे, सुनील महाराज पाटील इ. उपस्थित होते.
पुढे बोलतांना म्हणाले की, भविष्यात आपल्याच परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पुढील पिढयांना बेरोजगारी मुळे स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये याकरिता एकत्र येऊ या निर्धाराने लढा देऊया. यानंतर लवकरच रोजगार मेळावा घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत असेही ते म्हणाले.
यावेळी परभणी, पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा व पालम येथील विद्यार्थी, महिला, पुरुष तथा ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन किरण भूमरे यांनी केले.