Pandharpur News : विठ्ठल चरणी दिलेले दागिने वितळविण्याचा अधिकार मंदिर समितीला कोणी दिला ? हिंदू जनजागृती समितीचा सवाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळविण्याची अनुमती मंदिर समितीला महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. परंतु, दागिने वितळविण्याला हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शविला आहे. भक्तांनी श्रद्धेने दिलेले दागिने वितळविण्याचा अधिकार मंदिर समितीला कुणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वर्ष 1985 ते आतापर्यंतचे दागिने वितळविण्यात येणार आहेत. यामध्ये 28 किलो सोने असून 996 किलो चांदीचे दागिने आहेत. शासनाच्या आदेशानुसार या दागिन्यांतून निघणार्‍या शुद्ध सोने आणि चांदीच्या विटा बनवण्यात येणार असून त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. यात पुरातन काळातील आणि मौलीक दागिने जे शिवकालीन, होळकर कालीन, पेशवे कालीन, शिंदे सरकार यांनी दिलेले असून ते जतन करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन सोलापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, विक्रम घोडके, दत्तात्रय पिसे आणि विनोद रसाळ आदी उपस्थित होते.

समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नित्यपुजेतील दही-दूध यांसाठी वापरण्यात येणार्‍या मोठ्या पराती, महानैवेद्य यांचे चांदीचे भांडे यांच्याशी भाविकांच्या धार्मिक भावना निगडीत असल्याने ते जतन होणे आवश्यक आहे. अशा पुरातन वस्तू आता दुर्मिळ असून त्या वितळवण्याऐवजी त्यांचे एक चांगले प्रदर्शन भरवून येणार्‍या भावी पिढीला महाराष्ट्र राज्यातील वारकरी परंपरेचा इतिहास दाखवता येऊ शकतो.

इंग्लंड-अमेरिकेत मोठ्या व्यक्तींच्या ‘पेन’सारख्या लहानसहान वस्तूंचेही संरक्षण करून ते ठेवा म्हणून जपल्या जातात, तर मंदिर समिती हे का करू शकत नाही ? वर्ष 2012 मध्ये विधी विभागाने देवाच्या दागिन्यांची पहाणी केली असता त्यातील काही अलंकारांतील काही गोष्टी गहाळ झाल्याचे आढळून आले होते; मात्र पुढे हा अहवालच दडपण्यात आला. त्यामुळे वर्ष 1985 ते 2012 या कालावधीत काही दागिने गहाळ झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दागिने वितळवले गेल्यास वर्ष 2012 च्या प्रकरणातील अहवालाचे अन्वेषण करणे शक्य होणार नाही, तसेच यात भ्रष्टाचार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अशाच प्रकारचा निर्णय तामिळनाडू सरकारनेही घेतला होता आणि मंदिरातील 2 हजार 138 किलो सोने वितळविण्याची प्रक्रिया चालू केली होती. याला न्यायालयात आव्हान दिल्यावर मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला होता. सोने वितळविण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अपहार झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे? त्यामुळे श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्याऐवजी ते जतन करावेत असे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.