Akurdi : पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज –  शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आकुर्डीतील (Akurdi)  ग. दि. माडगूळकर नाट्यगृह उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलीकडच्या काळात समोर आला आहे.  नव्या 100 द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने 300 द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे (Akurdi)  यासाठी प्रयत्न करावे.

 

सांडपाण्यावर प्रक्रीया करा
पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे (Akurdi)  जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल.  प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड  आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

 

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार  आहे, असेही ते म्हणाले.

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली
गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला.  साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे.  हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या उद्योगधंद्यासोबत लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्याच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने शहरात  कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयावर प्रशासन काम करीत असून ते पूर्ण करण्यासाठी  प्रशासनाच्या गतीमानतेसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Nigdi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, पुढील 30 वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील.  मोशी येथे 200 खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.  ते म्हणाले, महापालिकेसाठी 312 कोटींची नवीन प्रशासकीय इमारत  उभी राहणार आहे.  ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला (Akurdi) देशातील  स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे,  असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.