Maval News: मावळचे आमदार शेतकऱ्यांसोबत की उपमुख्यमंत्र्यांसोबत? – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळचे आमदार सुनील शेळके मावळातील शेतकऱ्यांबरोबर आहेत की उपमुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, असा प्रश्न भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केला आहे. 

पवना जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी भाजपसह काही राजकीय पक्षांनी केली आहे. त्यावर भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असताना पवना जलवाहिनी प्रकल्प का रद्द केला नाही, असा सवाल आमदार शेळके यांनी उपस्थित केला. पवना जलवाहिनीच्या प्रश्नावर भाजप दुटप्पी भूमिका घेत असून भावनिक राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन आमदार शेळके यांना उत्तर दिले आहे. मावळचे विद्यमान आमदार यांना कल्पना नसेल परंतु मावळच्या जनतेला पूर्ण कल्पना आहे की, तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला? पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनात मावळचे विद्यमान आमदार जलवाहिनी विरोधी कार्यकर्ते होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होते व अजित पवार उपमुख्यमंत्री होते, याकडे भेगडे यांनी लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत. विद्यमान आमदारांना खरोखरच मावळच्या शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द केल्याचा शासन आदेश आणून त्यांना निवडून दिलेल्या मावळच्या जनतेला दाखवावा. मावळ तालुकातील नागरिक त्यांचे जाहीरपणे स्वागत करतील  व मावळ भाजप त्यांचा जाहीरपणे सत्कार करतील. त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी मावळमधील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. ते स्वतः प्रकल्पाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे जनतेसमोर जाहीर करावे, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

मावळ तालुक्यातील भारतीय किसान संघ, भाजपा, काँग्रेस (आय), शिवसेना, रिपाइं या पक्षांसोबतच तालुक्यातील जनतेचाही पवना बंदिस्त जलवाहिनीला कडाडून विरोध आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठ्यासाठी गहुंजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलावे परंतु थेट धरणातून बंदिस्त पाईपद्वारे पाणी उचलण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, अशी भूमिका भेगडे यांनी स्पष्ट केली.

पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व जखमी आंदोलकांना न विसरता त्यांनी पवनेच्या पाण्यासाठी दिलेले बलिदान मावळवासीय वाया जाऊ देणार नाही याची जाणीव विद्यमान आमदारांनी ठेवावी. तसेच राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार आहे मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहे त्यामुळे भाजपच्या कुठल्याही पत्राची तालुका असेल किंवा राज्य असेल अपेक्षा ठेवू नये व उपमुख्यमंत्री त्यांचे आमदार त्यांचा त्यांनी प्रकल्प रद्द करून घ्यावा भाजपच्या परवानगीची आवश्यकता ठेवू नये. मावळ भाजपा व मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक शेतकरी बंधू-भगिनी प्रकल्पाला कधीही समर्थन करणार नाही, असे भेगडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द व्हावा, हीच आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही अशीच राहणार आहे. विद्यमान आमदारांनी प्रथमत: त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते अजितदादा पवार यांच्या दबावामध्ये भाष्य करणार की मावळच्या जनतेबरोबर प्रकल्पाला विरोध करणार, असा सवाल रवींद्र भेगडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.