Mumbai: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी – अजित पवार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेलं योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेनं जगण्याची ताकद दिली. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांनं, कार्यानं महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील.

बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करु या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊ, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून 30 एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.