Pimple Saudagar News : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजय मशालीचा पिंपळे सौदागरमध्ये सन्मान

एमपीसी न्यूज – 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाच्या ऐतिहासिक कामगिरीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ‘स्वर्णिम मशाली’चे भ्रमण संपूर्ण भारतभर होत आहे. आज (दि.03) या मशालीला  पिंपळे सौदागर येथील रोझ लॅन्ड रेसिडेन्सी येथे आणण्यात आले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करत मशालीला मानवंदना दिली.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी व विद्यमान अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रोझ लॅन्ड रेसिडेन्सीच्या आवारात देशभक्तीमय वातावरण पहायला मिळाले. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते आणि कविता सादर करण्यात आल्या. मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठा होता. यावेळी हातात भारतीय तिरंगा घेऊन ‘भारत माता जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. रेसिडेन्सीच्या वेगवेगळ्या विंग मधून मशाल फिरवण्यात आली त्यावेळी नागरिकांनी मशालीवर पुष्पवृष्टी केली.

2021 हे वर्ष बांगलादेश निर्मिती युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाचे 50 वे वर्ष आहे. भारतीय सशस्त्र दलांनी केवळ दोन आघाड्यांवर विजयी युद्ध लढले नाही तर 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले तेव्हा युद्धाच्या इतिहासात अतुलनीय अशा कामगिरीची नोंद झाली.

संपूर्ण राष्ट्रात सुरू असलेल्या उत्सवांचा भाग म्हणून, नागरी प्रशासनासह दक्षिण कमांड 01 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पुण्यातील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच महिन्याभराचा उत्सव आयोजित करणार आहे. 01 ऑक्टोबर 2021 रोजी सरहद महाविद्यालय, कात्रज येथे विजय मशालीचे भव्य स्वागत करण्यात आल्यानंतर आज पिंपळे सौदागर येथे मशालीचे स्वागत करण्यात आले.

संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात, भोसले पब्लिक इंटरनॅशनल स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ यासारख्या शैक्षणिक आणि प्रख्यात संस्थांसह पुण्याच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी विजय मशालीचा सन्मान केला जाईल. एनडीए खडकवासला, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, बीईजी आणि लोणावळा येथील आयएनएस शिवाजी सारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये ही मशाल नेली जाईल. कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेले शूर सैनिक पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रात विजय मशालीला मानवंदना देतील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे एक कार्यक्रम होईल.

विजय मशालीचा सन्मान करण्यासाठी, शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक स्मारकाच्या पार्श्वभूमीवर भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. साळुंके विहारमध्ये राहणाऱ्या माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या सोसायटीतही विजय मशाल नेली जाईल. पुण्यातील मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी, मशाल समारंभांसाठी शिवाजी नगर पोलीस परेड मैदानावर नेली जाईल. अखेरीस 31 ऑक्टोबर रोजी, विजय मशाल नाशिक मार्गे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक या अंतिम गंतव्यस्थानाकडे रवाना होईल. देशाच्या चार मुख्य दिशांना प्रवास करणाऱ्या या विजयी मशाल 16 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा एकदा नवी दिल्ली येथे एकत्र येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.