Pimpri News: चंद्रकांत पाटलांनी स्वत:च्या नेतृत्त्वाचं आत्मपरिक्षण करावे – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट झाला. अजितदादा पुणे, पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. त्याच्या नेतृत्त्वाबद्दल शंका उपस्थित करण्यपेक्षा चंद्रकांत पाटलांनी आपल्याला कोल्हापूर सोडून कोथरुडमधून आमदार का व्हावं लागलं ? यावरून त्यांनी स्वत:च्या नेतृत्त्वाचं आत्मपरिक्षण करावे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ यांनी लगावला.

अजितदादा कमी पडत असल्यामुळे शरद पवार साहेबांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातल्याचं चुकीचं विधान चंद्रकांत पाटील करत असल्याचे सांगताना संजोग वाघेरे म्हणाले की, अजितदादांच्या सक्षम नेतृत्त्वाबद्दल शंका उपस्थित करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना त्यांच्या स्वत:च्या नेतृत्त्वाची चिंता करण्याची अधिक आवश्यकता आहे. शरद पवार साहेब आणि अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. उलट भरभरून दिलं असून उद्योगनगरी, आयटीनगरीच्या उभारणीपासून या दोन्ही शहरांचा कायापालट करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलं. पुढील 30-40 वर्षे समोर ठेवून शहरांचा विकास करत नवीन ओळख निर्माण करून दिली.

चंद्रकात पाटील स्वत: पालकमंत्री असताना त्यांनी या शहराकडे किती लक्ष दिले ? त्यांनी शहराचे कोणते प्रश्न निकाली लावले ? याचंही आत्मपरिक्षण त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं करावं. त्यांना अजितदादांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोल्हापुरातून निवडून येऊ शकत नाही, ही भीती वाटल्याने ज्यांना कोथरुडमध्ये येऊन आमदार व्हावं लागलं. त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाची चिंता करावी. तसेच, भाजपकडून महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यांच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींकडे चंद्रकांत पाटलांनी लक्ष द्यावं. त्याबाबत जनतेला उत्तरे द्यावीत, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.