Maharashtra News : आजपासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी

एमपीसी न्यूज : मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) जनतेशी संवाद साधला.

कारण नसताना उगाच कोणी आपल्याला घरात बंद करून ठेवणे हे कोणालाच आवडणार नाही, मात्र लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा. मास्क घाला, हात धुवा, शारीरिक अंतर राखा आणि लॉकडाऊन टाळा’, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ, असेही बजावले.

आज सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेनंतर आता ‘मी जबाबदार’ ही मोहीम राबवली जाईल आणि मंगळवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम ऑनलाईन होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करायचा का, असा थेट सवाल राज्यातील जनतेला केला. येत्या आठ दिवसांत याचे उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. ज्यांना लॉकडाऊन नको असेल ते मास्क घालणे, अंतर राखणे, हात धुणे या सूचना पाळतील. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विनामास्क फिरतील, असे बजावतानाच आता ‘मीच जबाबदार’ ही मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.