Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या ‘भारत बंदला’ वाढता पाठिंबा

एमपीसी न्यूज : नव्या कृषी विधेयकाला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. याला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शेतकरी आणि सरकार यांच्यात 9 डिसेंबरला आणखी एक बैठक होणार आहे. ‘भारत बंद’ अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

देशातील अनेक राजकीय पक्षांनी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएमध्ये राहयचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे.

चर्चेविना केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी देशव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे या ‘भारत बंद’ला समर्थन देत असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले आहे. तर देशच कोरोनामुळे बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत असल्याचे विसरता येणार नसल्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील, तर स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये जनतेने सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

या बंदला राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय अनेक बँक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.