Chakan Development : चाकणच्या विकासाकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे – राजेश अग्रवाल
एमपीसी न्यूज – चाकणकडे (Chakan Development) स्थानिक नेत्यांनी लक्ष देऊन विकासकामे करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. मागील दहा -पंधरा वर्षात चाकण भागात हवा तसा काहीही विकास झाला नाही. याचे मूळ कारण इथे शासनामार्फत विकासाचे कोणतेही काम झाले नाही. तळेगाव-चाकण रस्ता, नाशिक फाटा ते खेड रस्ता रुंदीकरण, चाकण चौक व अंबेठाण चौकतील उड्डाण पूल अनेक वेळा कागदावरच तयार होतात, पण जमिनीवर नाही.
चाकण, खेड भागातील दूरदृष्टी नसलेल्या राजकारणी व्यक्तींनी इथले आंतरराष्ट्रीय विमानतळ घालवले. पीएमआरडीएने पुण्यातील इतर भागात विकास कामासाठी खूप खर्च केला. पण, चाकण भागातून फक्त महसूल गोळा केला. एकही डीपी रोड किंवा टीपी स्कीम राबवली नाही. खडकवासलापर्यंत मेट्रो नेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण, चाकण मेट्रो नाही म्हणजे नाहीच. चाकण भागात एकदा काम केलेले बिल्डर परत या भागात काम करत नाही, नवीन उद्योजक एकदा चाकण चौकात अडकला तर तो परत इथे येतच नाही.
एमआयडीसी टप्पा पाचचा विकास अतिशय मंद (Chakan Development) गतीने होत आहे. एमआयडीसीचे टप्पा सहा, सात असे कोणतेही नियोजन नाही. चाकण भागात पाण्याची खूपच वाईट अवस्था आहे. पिंपरी चिंचवड सारख्या जलद गतीने विकास चाकण भागात होण्यासाठी इथे महानगरपालिका होणे ही काळाची गरज आहे,असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
या सर्व विषयासाठी आवाज उठवण्याची जवाबदारी ही स्थनिक जनप्रतिनिधीची आहे. जनप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्यांनी वरील विषयासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सर्व पक्षापक्षातील सर्व जनप्रतिनिधीनी चाकण-खेड भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती अग्रवाल यांनी केली आहे.