Maval News: पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम प्रकल्प रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही – संजय तथा बाळा भेगडे 

एमपीसी न्यूज – पवना बंद जलवाहिनीला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून प्रकल्प रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा भाजप नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला आहे. 

बंद जलवाहिनी संदर्भात पंचायत समिती कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे बोलत होते. आरपीआय जिल्हाअध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, तालुका काँग्रेस आयचे माजी अध्यक्ष अ‍ॅड दिलीप ढमाले, सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, सदस्या ज्योती शिंदे मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

9 ऑगस्ट 2011 ला मावळ तालुका भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, काँग्रेस, शिवसेना, आर.पी. आय. या सर्व पक्षांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड बंद जलवाहिनीच्या विरोधात मावळ बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांवर करण्यात आलेला गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये 3 शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले व अनेकांना शरीराच्या अवयवावर गोळ्या लागून अनेकजन गंभीररित्या जखमी झाले.

या घटनेची संपूर्ण देशात दखल घेण्यात आली आणि सगळीकड़े तत्कालीन सरकारच्या या आडमुठी धोरणाचा जाहिर निषेध करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बंद जलवाहिनी प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी ही योजना या ठिकाणच्या शेतकरी व संघटनाना कधीही विश्वासात न घेता पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बाळा भेगडे, सूर्यकांत वाघमारे, अ‍ॅड दिलीप ढमाले व रवींद्र आप्पा भेगडे आदींची भाषणे झाली. रावेतवरून पिंपरी चिंचवड नगरपालिकेने पाणी उचलावे, बंद  जलवाहिनीद्वारे पाणी नेण्यास कायम विरोधच आहे. ही योजना कायमस्वरूपी बंद व्हावी. असाच सर्वांच्या भाषणाचा सूर होता.

सद्यस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून बंद जलवाहिनी प्रकल्प सुरु करण्याच्या हालचाली चालू झालेल्या आहे. त्यामुळे  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत.

मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरून या बंद जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे व ह्या बंद जलवाहिनी प्रकल्पास वरील सर्व पक्षांचा विरोध असून ती कायमस्वरूपी रद्द व्हावी अशी आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.