Alandi News : बदनामी केल्याचा जाब विचारल्यावरून एकावर खुनी हल्ला, सहा जणांना बेदम मारहाण, महिलेचा विनयभंग

नऊ जणांना अटक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर बदनामी केल्याचा जाब विचारल्यावरून सोळा जणांच्या टोळक्याने सहा जणांना बेदम मारहाण केली. त्यातील एकावर खुनी हल्ला केला. तसेच एका महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री चिंबळी येथील जाधव वस्तीवर  घडली.

माऊली उर्फ ज्ञानेश्वर महादेव बर्गे (वय 35), चेतन तानाजी बर्गे (वय 23), सागर संभाजी बर्गे (वय 26), माऊली गोपाळ बर्गे (वय 36), अजय तानाजी बर्गे (वय 25), अमोल सुरेश बर्गे (वय 30), सुरज हिरामण बर्गे (वय 24), प्रणव शंकर बर्गे (वय 19), धीरज हिरामण बर्गे (वय 22, सर्व रा. चिंबळी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह इतर पाच ते सात साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तीस वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 3)  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी चिंबळी ग्रामपंचायतीला स्मशानभूमीसाठी जागा दान केली आहे. त्या जागेत विहीर खोदण्याचे काम थांबवण्यात आले होते. याची आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर महादेव बर्गे याने व्हाट्सअप ग्रुपवर बदनामी केली. याचा फिर्यादी यांनी आरोपीला जाब विचारला.

त्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लोखंडी पाइप, लाकडी दांडके, हॉकी स्टिक यांसारख्या हत्यारांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ, वहिनी, बहीण, चुलत भाऊ, चुलते यांच्या हातापायावर, डोक्यावर, पाठीवर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या भावाला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या वहिनींचा गळा दाबून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.