Pimpri News: फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या भूमीपूजनचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; महापौर, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या कामाच्या भूमीपूजनासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची रितसर वेळ घेतली नाही. केवळ निमंत्रणपत्रिकेवर नाव टाकण्याची औपचारिकता पूर्ण केली. पवार यांना याबाबत काहीच माहिती नाही. ते उद्या आले नाही. तर, नकारात्मक चर्चा होईल, असे सांगत महापौर, आयुक्तांच्या कार्यपद्धीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. छत्रपती संभाजीराजे यांना आमचा आक्षेप नसून ते वंदनीय, आदरणीय व्यक्ती आहेत. पण, सत्ताधा-यांनी पालकमंत्र्यांची नियोजित वेळ घेणे आवश्यक होते. प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे होते, अशी भूमिका राष्ट्रवादी पदाधिका-यांनी मांडली.

महापालिकेच्या वतीने पिंपरीत फुलेसृष्टी आणि चिंचवडमध्ये शाहूसृष्टी उभारण्यात येणार आहे. या कामाचे उद्या (मंगळवारी) खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. पण, या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची वेळ घेतली नाही. त्यांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर, स्थानिक नगरसेविका मंगला कदम यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी संवाद साधला.

महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद््घाटन, भूमीपूजन यासाठी पालकमंत्री अजित पवार यांची वेळ घेतली जात नाही. केवळ निमंत्रण पत्रिकेत नाव टाकून औपचारिकता पूर्ण केली जाते. फुलेसृष्टी, शाहूसृष्टीच्या भूमीपूजनासाठी प्रशासन आणि सत्ताधा-यांनी पालकमंत्री पवार यांची नियोजित वेळ घेणे आवश्यक होते. पण, घेतली नाही. केवळ निमंत्रणपत्रिकेत नाव टाकून सोपस्कर पूर्ण केले. या कार्यक्रमाबाबत पवार यांना काहीच माहिती नाही. महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यापैकी कोणीही पवार यांच्याशी संपर्क साधला नाही. हे अतिशय चुकीचे आहे.

संभाजीराजे यांना आमचा अजिबात विरोध नाही. ते वंदनीय, आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमाला पालकमंत्री गैरहजर राहिल्यास त्याची नकारात्मक चर्चा होईल. त्यामुळे सत्ताधारी, प्रशानाने पालकमंत्री पवार यांची नियोजित वेळ घेऊन कार्यक्रम ठेवणे आवश्यक होते. याबाबत आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे विचारणा केली असता आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत त्यांनी कानावर हात ठेवल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सांगितले.

याबाबत बोलताना राजू मिसाळ म्हणाले, ”छत्रपती संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही. ते आदरणीय आहेत. पण, सत्ताधारी, प्रशासानाने ‘प्रोटोकॉल’चे पालन करणे आवश्यक होते. पालकमंत्री अजित पवार यांची नियोजित वेळ घेणे गरजेचे होते. प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही. कार्यक्रमासाठी आपलीही परवानगी घेतली नव्हती असे आयुक्तांनी सांगितले. उद्याच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री यांची नियोजित वेळ घेतली नसल्याबाबत मला माहिती नाही असे आयुक्त म्हणाले. संभाजीराजे नसते तर आम्ही नक्कीच काळे झेंडे घेऊन गेले असतो. आम्ही महाराजांचा अपमान करणार नाही. यामध्ये सुधारणा करतो असे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त अजितदादांशी बोलणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.