Pimpri: आता अधिकारी सांगतात शहराची वाटणी झाली; शरद पवार यांचा कारभा-यांवर हल्लाबोल
एमपीसी न्यूज – मी अधिका-यांकडून ऐकतो. अधिकारी मला सांगतात. पिंपरी-चिंचवड शहराची वाटणी झाली आहे. रस्त्याच्या पलीकडे एक आणि रस्त्याच्या अलीकडे एक अशी वाटणी करुन घेतली आहे. हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनता वाटपाच्या राजकारणाला वैतागली आहे. वाटपाचे राजकारण लोकांना पसंत नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप कारभा-यांवर केला. जनतेला बदल पाहिजे आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या 36 नगरसेवकांनी आवाज उठविला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांसाठी महापालिकेत आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
भोसरीत बोलताना शरद पवार म्हणाले, महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मी अनेकदा शहरातून जात असतो. शहरातून जाताना जाणवते की पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहरात जास्त सुधारणा झाल्या आहेत. रस्ते, उद्याने, उड्डाणपुल झाले आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी महापालिकेचा विकास चांगला झाला. शहर चांगले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी चांगले काम केले. त्याचे श्रेय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. तीनवेळा जनतेने आपल्याला महापालिकेत सत्ता दिली. मागच्या वेळेला धक्का बसला. याचे आश्चर्य वाटत आहे.
- मी अधिका-यांकडून ऐकतो. आता अधिकारी मला सांगतात. पिंपरी-चिंचवड शहराची वाटणी झाली आहे. रस्त्याच्या पलीकडे एक आणि रस्त्याच्या अलीकडे एक अशी वाटणी करुन घेतली आहे. हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनता वाटपाच्या राजकारणाला वैतागली आहे, असे सांगत शरद पवार म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 नगरसेवक आहेत. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक व्हावे. महापालिकेतील चुकीच्या कामावर आवाज उठवावा. महापालिकेत, रस्त्यावर उरतरुन जनतेची लढाई लढावी, अशा सूचना पवार यांनी नगरसवेकांना दिल्या आहेत.