Pimpri News: वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करा, विद्यार्थ्यांना वेळेत रेनकोट वाटप करा; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या अकराव्या जनसंवाद सभेत सुमारे 128 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करावी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत रेनकोट वाटप करावे अशी मागणी केली.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभांचे आयोजन केले जाते. आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 26, 17, 13, 7, 13, 13, 27 आणि 12 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आज पार पडलेल्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह स्थापत्य, जलनिसाःरण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. त्यामध्ये पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, वृक्षारोपण करावे, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनची कामे करावी, आरक्षित मैदाने विकसित करावी, अनधिकृत पत्राशेड हटवावे, अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावी, धोकादायक तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करावी, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत रेनकोट वाटप करावे, नियमानुसार नामकरण झालेल्या वास्तू, रस्ते आणि मैदानांचे नामफलक लावावेत, सी सी टीव्ही केबलसाठी खोदण्यात आलेले रस्ते वेळेत बुजवावेत, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, पदपथ आणि दुकानासमोरील अतिक्रमणे हटवावी, पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजवावेत आणि उखडलेले रस्ते लवकर दुरुस्त करावे, आवश्यक ठिकाणी सुलभ शौचालये उभारावीत, रोडवरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने हटवावीत अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी जनसंवाद सभेचे कामकाज उत्कृष्ट असल्याने जनतेची कामे कमी वेळेत मार्गी लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शहरात आता स्वच्छता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेली ‘स्वच्छाग्रह’ मोहिम अत्यंत परिणामकारक ठरत असून नागरिकांनीही या उपक्रमामध्ये निरंतर सहभाग नोंदविल्यास आपले शहर स्वच्छतेसाठी अग्रेसर राहील, असे मतही नागरिकांनी यावेळी नोंदवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.