Talegaon Dabhade : प्राथमिक शिक्षणानंतरची गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज – कृष्णराव भेगडे

रामदास काकडे यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ यशोदा महादेव काकडे  इमारतीचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – समाजातील अज्ञान व दारिद्रय संपविण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडत आहेत. ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली. 

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आपल्या मातोश्री यशोदा महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीमधून नूतन वास्तू साकारत आहे. यशोदा महादेव काकडे नूतन वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी कृष्णराव भेगडे बोलत होते.

यावेळी माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब काकडे, व्ही. एस काळभोर, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, सातारा येथील यशोदा संस्थेचे सचिव अजिंक्य सगरे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे,दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा तसेच संचालक गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, विलास काळोखे, संदीप काकडे, तसेच संस्थेच्या विकास समितीचे संजय साने, चंद्रभान खळदे, परेश पारेख, युवराज काकडे, सुनील काशिद, संजय वाडेकर, नंदकुमार शेलार, गणेश काकडे,

किरण काकडे, संग्राम काकडे, राजेश म्हस्के, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर,माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उद्योजक सुरेश अगरवाल, आर्किटेक्ट केदार कुलकर्णी, सदाशिव नेवाळे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डी. फार्मसीचे प्राचार्य जी.एस. शिंदे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. विठ्ठल चोपडे, डॉ. बी.बी. जैन, तसेच तळेगावमधील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, संस्थेच्या शाळा,  महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कृष्णराव भेगडे पुढे बोलताना म्हणाले, की मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना महाविद्यालया अभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. आता नव्या पिढीकडे संस्थेची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत.

बाळा भेगडे म्हणाले, की मावळ तालुक्यातील शिक्षणाच्या पाऊलवाटा विस्तारण्याचे काम कृष्णराव भेगडे यांनी केले. त्यांनी शिक्षणाचा वसा या तालुक्याला दिला. त्यांचे शिक्षणविषयक कार्य जोमाने पुढे नेण्यास आम्ही बांधील आहोत.

मदन बाफना यांनी सांगितले, की पैसे अनेकजण कमावतात, पण आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने त्यातील काही रक्कम रामदास काकडे यांच्यासारखे फार थोडे लोक समाजासाठी देतात. दानशूर व्यक्तींमुळे अनेक शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या.

प्रास्तविकात संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांनी नव्या इमारती बद्दल माहिती दिली. तसेच ही नवी इमारत तळेगावच्या वैभवात भर टाकणारी असेल, असे सांगितले.

शैलेश शहा यांनी सांगितले, देणाऱ्याच्या एक एक विटेच्या माध्यमातून ही नवी साकारली जाणारी इमारत सर्वोत्तम असणार आहे. या शैक्षणिक संकुलाचा फायदा मावळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे, बापूसाहेब भेगडे यांनीही विचार व्यक्त केले. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन, तर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आभार मानले.

44 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला – रामदास काकडे

भूमिपूजन समारंभावेळी बोलताना रामदास काकडे म्हणाले, की अवघ्या 44 विद्यार्थी संख्येवर सुरू केलेल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत आज सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मावळ तालुक्याला एज्युकेशनल हब व इंडस्ट्रीयल हब बनविण्यात कृष्णराव भेगडे यांचा मोठा वाटा आहे. माझ्या आईवडिलांना शिक्षणाविषयी आस्था होती. त्यामुळे हा सन्मान माझ्या आईचा आहेच; पण मावळातील माता भगिनींनी मुलांना शिकविण्याची जिद्द ठेवली, अशा महिलांना ही इमारत समर्पित आहे. प्र.के. अत्रे, रँग्लर परांजपे यांनी सुरू केलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे, ही अभिमानाची बाब आहे. तळेगावाने काकडे कुटुंबाला खूप काही दिले आणि याची जाणीव काकडे कुटुंबीय कधीही विसरणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.