Andhra Bhama Askhed : आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाच्या आढाव्यासाठी समन्वय समिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा, भामा-आसखेड (Andhra Bhama Askhed) धरणातून 267 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त दर आठवड्याला तर आयुक्त शेखर सिंह दर 15 दिवसाला बैठक घेवून कामाचा आढावा घेणार आहेत.

शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045  पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. पुढील 20 दिवसात पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलण्यात येणार आहे. त्यातून समाविष्ट गावांची तहान भागविली जाणार आहे.

आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या कामाला गती (Andhra Bhama Askhed) देण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, नगररचना विभागाचे उपसंचालक आणि प्रकल्प सल्लागार असणार आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्वकांक्षी असलेला आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे. या प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग, देहूगाव नगरपंचायत यांच्या हद्दीतून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. या प्रकल्पाची विहीत कालमर्यादेत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय राखणे आवश्यक आहे. त्यासाठी पाच जणांच्या समितीची स्थापना केली आहे.

Bhaskar Jadhav : नारायण राणेंविरोधात केलेले विधान भास्कर जाधव यांना पडणार भारी? पुण्यात गुन्हा दाखल

ही समिती आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाशी संबंधित कामाचा, उद्भवणा-या अडचणींचा आढावा घेईल. त्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. समिती अध्यक्षांच्या संमतीने महापालिकेच्या इतर विभागप्रमुखांना समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याची मुभा असेल. तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण होईल याची समितीने दक्षता घ्यावी. प्रकल्पाशी संबंधित केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी आयुक्तांना अवगत करावा असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

जागा ताब्यात घेण्यासह विविध अडचणींवर तोडगा काढणार

अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील म्हणाले, ”निघोजे बंधा-यातून पुढील 20 दिवसात 50 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा केला जाईल. या भागाला पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा शहरातील ज्या भागात पाणी समस्या आहे. त्या भागाला केला जाईल. त्यामुळे पाण्याची समस्या कमी होण्यास थोडी मदत होईल. आंद्रा, भामा-आसखेड पाणी प्रकल्पाला गती दिली जाईल. दर आठवड्याला मी तर, आयुक्त दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. जागा ताब्यात घेणे, विविध अडचणींवर तोडगा काढून कामाला गती दिली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.