FINNAPP : मृतात्म्यांना मतदारयादीतून ‘मुक्ती’ मिळवून देण्यासाठी सुचवला फंडा
एमपीसी न्यूज – मृत्यूनंतरही अनेक व्यक्तींची नावे वर्षानुवर्षे मतदारयादीत तशीच असतात. त्यामुळे मग मृत्यूनंतरही त्यांच्या नावाने मतदान होण्याचे ‘चमत्कार’ घडत राहतात.(FINNAPP)अशा मृत व्यक्तींची नावे मतदारयादीत राहणार नाहीत व मृतात्म्यांना मतदारयादीतून ताबडतोब मुक्ती मिळेल, असा फंडा पुण्याच्या फोरम फॉर इनोव्हेशन अँड अॅप्लिकेशन (FINNAPP Association) या कंपनीने राज्य शासनाला सुचविला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
‘फिनॅप’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चिंचवडच्या चिन्मय कवी यांनी ही माहिती दिली. यापूर्वीही अनेक गंभीर समस्यांवर ‘फिनॅप’ने (FINNAPP) अत्यंत प्रभावी उपाय सुचविले आणि त्याची अंमलबजावणीही झाली आहे. मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यापासून वाहतूक नियमांचे प्रभावी पालन होण्यासाठी यंत्रणा विकसित करणे असो, विविध विषयांवर सखोल अभ्यास करून शासनाला उपाय सुचविण्यात ही कंपनी नेहमीच अग्रेसर असते.
मतदार यादीतील मृतांची नावांच्या समस्येवर अभ्यास करून फिनॅपने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोवा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांच्या प्रमुखांना ‘फिनॅप’ने प्रस्ताव पाठविला आहे.
Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज केवळ 5 नवीन रुग्णांची नोंद
मतदारयादीत मृतांच्या नावांचे प्रमाण चार टक्के!
‘फिनॅप’ने केलेल्या अभ्यासात मतदारयाद्यांमध्ये मृतांची नावे असण्याचे प्रमाण हे सुमारे चार टक्के एवढे आहे. महाराष्ट्रात 2017 ते 2019 या काळात मतदारसंख्या सुमारे आठ कोटी 40 लाख होती. चार टक्क्यांच्या हिशेबाने त्यातील मृत मतदारांच्या नावांची संख्या 33 लाख 60 हजार होते. (FINNAPP) या मृतांची नावे वगळण्याची प्रक्रिया पुरेशा गांभीर्याने राबविली जात नाही. त्यामुळे ही मृतांची नावे वर्षानुवर्षे मतदारयादीत कायम राहतात.
मतदार यादीत मृतांची नावे असण्यामुळे निवडणूक प्रक्रियेत त्याचा गैरवापर होताना दिसतो. या व्यतिरिक्त राज्याच्या आर्थिक व शासकीय धोरणांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो, याकडे ‘फिनॅप’ने शासनाचे लक्ष वेधले आहे.
निवडणूक आयोगाचा फॉर्म ‘सात‘ भरल्यानंतरच द्यावा मृत्यू दाखला
मतदार नोंदणी कायदा 1960 नियम 13 (2) नुसार वय वर्षे 18 वरील व्यक्ती जोपर्यंत निवडणूक मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक सहा जमा करीत नाही, तोपर्यंत त्याचे नाव मतदारयादीत येत नाही. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी कायदा नियम 26 ( ब3) असे सांगतो की, फॉर्म क्रमांक 7 जमा केला जात नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येत नाही.
जन्म-मृत्यू दाखला देण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केले जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला देताना मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने निवडणूक आयोगाचा फॉर्म सात भरणे बंधनकारक करणारा कायदा करण्यात यावा व राज्य शासनाने हे फॉर्म निवडणूक आयोगाकडे जमा करावेत.(FINNAPP) त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर दाखला काढतानाच मृत व्यक्तीचे नाव मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया देखील पूर्ण होईल, असे ‘फिनॅप’ने पत्रात सुचविले आहे.
‘फिनॅप’च्या या सूचनेची महाराष्ट्र व गोवा शासनाने तातडीने दखल घेतली असून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.(FINNAPP) शासकीय लालफितीच्या कारभारात मृतांना मतदारयादीतून मुक्ती मिळण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, याचे उत्तर काळच देऊ शकेल.