Jansanvad Sabha : गणेश मंडळाच्या ठिकाणी प्लास्टिक मुक्ती, कापडी पिशवी वापरासंबंधी जनजागृती करावी; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत फडकवण्यात आलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवून योग्य ठिकाणी ठेवावेत, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी प्लास्टिक मुक्ती आणि कापडी पिशवी वापरासंबंधी जनजागृती करणारे संदेश फलक लाऊन कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात यावे, अशा सूचना आज (सोमवारी) झालेल्या जनसंवाद (Jansanvad Sabha) सभेत नागरिकांनी मांडल्या.

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे तसेच शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 68 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 11, 6, 7, 6, 9, 4, 14 आणि 11 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे  सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते.

Chandrakant Patil : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार!

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन याव्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी (Jansanvad Sabha) व सूचना मांडल्या.  शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे, नव्याने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाना देण्यात यावे, शहरात विविध ठिकाणी झाडांना लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांमुळे झाडांची वाढ खुंटली आहे, अशा झाडांच्या जाळ्या तात्काळ काढण्यात याव्यात, पिंपरी येथील स्मशान भूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, जलवाहिन्यांचे अर्धवट असलेले काम पूर्ण करावे तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात, कचरा संकलित करण्यासाठी घंटा गाडी पाठवावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, शहरात विविध ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत, अशा ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

रस्त्यात पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, खाजगी जागेतील बांधकामामुळे रस्त्यावर राडारोडा पडून राहिल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे, याबाबत संबंधित मालमत्ता धारकास दंड करावा, शहरात आवश्यक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारावेत, रस्त्याच्या मध्यभागी आणि पदपथावरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, अशा सूचना व तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.