Maval : इंद्रायणी नदीत पडलेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध दुस-या दिवशीही सुरूच

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तोडून कार नदीपात्रात पडली. कारमधील तीन जणांपैकी एकजण पोहून बाहेर आला. एकाच मृतदेह कारसोबत काढण्यात आला. तर, तिस-या तरुणाचा शोध 24 तासानंतरही सुरूच आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक (एनडीआरएफ), आयएनएस शिवाजी लोणावळा, पोलीस कर्मचारी, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग मित्र संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी तरुणाचा शोध घेत आहेत.

स्विफ्ट डिझायर कारमधून अक्षय संजय ढगे (वय 20), संकेत नंदु असवले (वय 20) आणि अक्षय मनोहर जगताप (वय 20, तिघेही रा. टाकवे बु., ता. मावळ) हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी नदीवर कार आली असता संकेतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. काही वेळेनंतर अक्षय ढगे या तरुण पोहून बाहेर आला. मात्र त्याचे दोन मित्र कारमध्येच अडकून राहिले.

  • घटनेची माहिती मिळताच टाकवे गावातील नागरिक नदीकडे धावत आले. दरम्यान, वडगाव मावळ पोलीस, एनडीआरएफच्या पथकांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. नदीच्या काठावर आणि पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. पुलावर बचाव पथकाचे काम सुरु असल्याने पोलिसांनी गर्दी पांगवून दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवली. यामुळे सुमारे एक ते दोन किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

एनडीआरएफ च्या जवानांनी दिवसभर नदीपात्रात कार शोधली. मात्र, दिवसभर कार सापडली नाही. आयएनएस शिवाजी लोणावळा येथील पथकाने पाणबुड्यांच्या सहाय्याने शोध घेतला. रात्री नऊच्या सुमारास कार शोधण्यात बचाव पथकाला यश आले. क्रेनच्या साहाय्याने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये संकेत आसवले याचा मृतदेह आढळून आला. अजूनही अक्षय जगताप बेपत्ताच होता. पथकाने पुन्हा काही वेळ शोधकार्य सुरु ठेवले. रात्री शोधकार्यात अडचण येत असल्याने रात्री उशिरा अक्षय जगतापचा शोध थांबवण्यात आला.

  • शुक्रवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास शोधकार्य पुन्हा सुरु झाले आहे. मावळचे नायब तहसीलदार चाटे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात हे शोधकार्य सुरु आहे. दुपारी बारा पर्यंत कोणतेही पथक न आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थ चिंतातुर झाले होते. साडेबाराच्या सुमारास आयएनएस शिवाजी लोणावळा, एनडीआरएफ सुदुंबरे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती यांची पथके इंद्रायणी नदीत दाखल झाली आहेत. दोन्ही पथके शोधकार्य करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.