Alandi News : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे धानोरेत बेमुदत धरणे आंदोलन; कामगारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहिती

एमपीसी न्यूज – आळंदीतील मरकळ येथील रस्त्यावरील धानोरेतील राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या कंपनीतील कामगारांना कोरोना काळात असलेल्या निर्देशांचे पालन न करता बेकायदेशीररित्या कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कंपनीच्या समोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. कामगारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे कामगार नेते, संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.

या धरणे आंदोलनात संघटनेचे सभासद, राठी ट्रान्सपॉवर प्रा.ली. धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी येथील बडतर्फे 100 कामगारांसह सुमारे 150 च्यावर कामगार सभासद, संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभागी नोंदविला आहे. धरणे आंदोलनास आळंदी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता सुव्यवस्था कायम रहावी यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु रहाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राठी ट्रान्सपॉवर इंडिया प्रा.ली धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी या कंपन्यांतील व्यवस्थापनाने कोरोना काळातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना आदेश नियमांचे उल्लंघन करून सुमारे शंभर कामगारांना कामावरून कमी केले.

तसेच कोरोना कालावधीतील वेतन कपात केले. यामुळे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी कामगार संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाच्या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुरावे तपासून दाव्यात असा आदेश देण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले. कामगारांना परत कामावर घेऊन कपात केलेले वेतन द्यावे असे निर्देश अप्पर कामगार आयुक्त यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निकाल देण्यात आला होता, मात्र व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. उलट व्यवस्थापनाने सूडबुद्धीने खोटे आरोप लावून 70 कामगारांवर निलंबनाची कारवाई करून बडतर्फ केल्याचा आरोप भोसले यांनी केला.

यामुळे उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. यावर निर्णय प्रलंबित असताना राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या दोन्ही कारखान्यांनी कामगारावर खोटे आरोप लावून दोन्ही कारखान्यातील शंभर कामगारांना निलंबित बडतर्फ केले. त्यामुळे कामगार व कुटुंबीय यांच्यात असंतोषाचे वातावरण व भविष्यातील रोजगार गेल्याने आयुष्य उध्वस्त झालेल्या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दोन्ही कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी यासाठी धानोरे येथील राठी ट्रान्सपॉवर, पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली कंपनीच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन आजपासून सुरु करण्यात आले आहे. हे धरणे आंदोलन शांतता व कायदा सुव्यवस्था राखून कामगारांच्या हितासाठी धरणे आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भोसले पुढे म्हणाले, कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन करणे हे संघटनेचे कर्तव्य असून त्याप्रमाणे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करत आहे. कामगारांच्या कायदेशीर मागण्या पूर्ण कराव्यात. कामगारांची उपासमार थांबावी. यासाठी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देऊन युनियन केली आहे. या कारणावरून सूडबुद्धीने कामावरून काढलेल्या कामगारांना व त्यांच्या प्रतिनिधी यांना पूर्ववत कामावर घ्यावे.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सूडबुद्धीने खोटे आरोप व स्वतःच्या चौकशी अधिकारी लावून बडतर्फ केलेल्या राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली धानोरे व सणसवाडी येथील कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्या सर्व कामगारांना पुन्हा पूर्ववत कामावर घ्यावे.

याशिवाय सणसवाडी येथील इतर कामगारांप्रमाणे समान काम, समान वेतन या कायद्या नुसार मागील फरक आणि वेतन, मागील दोन मागणी पत्र दिली असून त्यातील प्रलंबित मागण्या आहेत. त्यावर चर्चा करून करार करण्यात यावा. या मागण्या कामगारांच्या न्याय हिताच्या असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही,तो पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू रहाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. भारत माता कि जय, वंदे मातरम, हम सब एक है, कामगार एक जातीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत बेमुदत आंदोलनास भोसले यांचे नेतृत्वात सुरुवात करण्यात आली.

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी – कंपनी व्यवस्थापन

या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे की, कंपनी समोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ते न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना केलेले आंदोलन आहे. या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनाकडून एक दिवस आदी मिळाली आहे. संबंधित युनियनची केस मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे आपण सर्वानी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. तसे औद्योगिक शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. येथील 40 स्टाफ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोर्टाचा आदेश आल्यास त्या प्रमाणे कामकाज होईल. कामगार यांना कोरोना काळातील सर्व लाभ व वेतन वेळोवेळी दिले असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.