Maharashtra News : राज्यात नवीन 23 संवर्धन राखीव, 5 अभयारण्ये

एमपीसी न्यूज – राज्यात मागील अडीच वर्षांत 1750.63 चौ.कि.मीचे 23 नवीन संवर्धन राखीव, 647.1294 चौ.कि.मी ची 5 नवीन अभयारण्ये आणि 85.89 हेक्टरच्या 4 जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित आहे. या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्त्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 23 संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी 9 संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना काढण्याची कार्यवाही सुरु आहे.

Actor Isha Agarwal : अभिनेत्री ईशा अग्रवाल ‘झोलझाल’मधून मराठी सिनेसृष्टीत झळकणार

ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे चौ.कि.मी)
राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात जी नवीन संवर्धन राखीव क्षेत्रं घोषित झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी (29.53) जोर जांभळी (65.11), आंबोली दोडामार्ग (56.92), विशाळगड (92.96), पन्हाळगड (72.90), मायणी पक्षी संवर्धन (8.67), चंदगड (225.24), गगनबावडा (104.39), आजरा भुदरगड (238.33),मसाई पठार (5.34), नागपूर जिल्ह्यातील मुनिया (96.01), मोगरकसा (103.92), अमरावती जिल्ह्यातील महेंद्री (67.82), धुळे जिल्ह्यातील चिटबावरी (66.04), अलालदरी (100.56), नाशिक जिल्ह्यातील कळवण (84.12), मुरागड (42.87), त्र्यंबकेश्वर (96.97), इगतपुरी (88.50), रायगड जिल्ह्यातील रायगड (47.62), रोहा (27.30), पुणे जिल्ह्यातील भोर ( 28.44), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) (1.07), यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही 9 संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाली आहेत.

पाच अभयारण्ये

शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव (269.40 चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य ( 78.40), जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी (122.740), गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का ( 175.72), बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य ( 8694) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जैवविविधता वारसा स्थळे

पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (33.01), धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी (48.08), कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (2.59) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसुचना निर्गमित झाली आहे. तर, लोणार ला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.