Indrayani River : ऐन पावसाळ्यातही इंद्रायणी नदी प्रदूषितच
एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी (Indrayani River) काठच्या गावातून इंद्रायणी नदीत मैलमिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने ऐन पावसाळ्यात ७ ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी ,आळंदी येथील सिद्धबेट येथील जुन्या बंधाऱ्यातून मैलामिश्रित रसायनयुक्त पिवळसर पाणी नदी पात्रात पडून त्याचा साबणासारखा फेस तयार होऊन तो फेस पाण्यावर तरंगताना दिसत होता.
या नदी पात्रातील प्रदूषित पाणी विद्युत मोटारीद्वारे शेतात नेऊन भाजीपाला व विविध पिकांना दिले जाते. त्यामुळे भाजीपाल्यांवर व इतर पिकांवरही दूरगामी परिणाम होत आहे. याचा विचार करता, हे रासायनिकयुक्त सांडपाणी प्रदूषित पाणी पिकांना वापरल्यामुळे ही सर्व पिके खाण्यासाठी माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहेत.
आषाढी वारी सोहळा दरम्यान आळंदी येथील इंद्रायणी नदीचे नदीपात्रातील पाणी दूषित असल्याने व त्याचा परिणाम नदीपात्रा जवळील असणाऱ्या विहिरींच्या, बोरच्या पाण्यावर होत असल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी त्यावेळी भाविकांना दिल्या होत्या. इंद्रायणी नदीचे दूषित पाणी देहू-आळंदी येथील भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात. नदीत स्नान करून मानवी देहाला पवित्र करून घेण्याची परंपरा आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे या भाविकांच्या आरोग्याचा देखील मोठा प्रश्न आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जावे, नदी प्रदूषण कमी करावे यासाठी स्थानिक, राजकीय, सामाजिक, पर्यावरण प्रेमी संस्था (Indrayani River) अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले आहेत.
जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्या सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. ज्या कारखान्यामुळे अधिक प्रदूषण होते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. अशी यावेळी आळंदीतील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू – अजित पवार