Kanhe Unemployment Problem : कान्हे येथे अनेक समस्यांअभावी ग्रामीण भागातील युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार!

एमपीसी न्यूज – (श्याम मालपोटे) – कान्हे व टाकवे बुद्रुक औद्योगिक (Kanhe Unemployment Problem) वसाहत या ठिकाणी अनेक लहान मोठ्या औद्योगिक कंपनी स्थित आहेत. मात्र, काही समस्यांच्या अभावी येथील कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने युवकांच्या हाताचा रोजगार जात आहे व कामगार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार आलेली आहे.

दरम्यान, टाकवे बुद्रुक येथे पंचवीस वर्षापूर्वी अनेक कंपन्या आल्या. त्यानंतर आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला. परिणामी युवकांना कायमस्वरूपी कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध झाली. मात्र, अचानक सात ते आठ वर्षापूर्वी येथील तीन नामवंत कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला व परिणामी जवळपास नऊ ते दहा हजार युवकांचा रोजगार गेला. त्या दरम्यान अनेक कंपन्यांमध्ये युनियन होऊ घातल्याने कंपनी व कामगार यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पेटू लागली. या काळात कामगारांनी कंपन्या स्थलांतरित होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आणले असता, त्यांनी भूमीपुत्रांना अनेक आश्वासने दिली. मात्र, ती आश्वासने हवेतच विरून गेली. तसेच, या कंपन्यांवर आधारित असणारे अनेक छोटे उद्योजक व छोटे वर्कशॉप बंद पडले, राजकीय नेते सदर कंपन्या स्थलांतरित होण्यापासून थांबू शकले नाहीत. परिणामी युवकांच्या हाताचा रोजगार बुडाल्याने अनेक कुटुंबांची वाताहात झाली.

मावळमधील अनेक युवकांना आपले कुटुंब स्थलांतरित करून पुणे-मुंबई सारख्या शहरी भागाचा आश्रय घ्यावा लागला आहे. शहरी भागांमध्ये हाताला मिळेल ते काम करण्यास युवकांनी सुरुवात केली. येथील कंपन्या स्थलांतरित होण्यास नक्की जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न बेरोजगार झालेली तरुणांनी उपस्थित केला आहे.

या आहेत मुख्य समस्या – Kanhe Unemployment Problem

कान्हे येथे रेल्वे ओव्हरब्रिज नसल्याने रेल्वे क्रॉसिंगमुळे या भागातून कंपन्यांचा होणारा ट्रान्सपोर्ट व कंपन्यांमध्ये येणारे कामगार त्यांना होणारा विलंब. यामुळे औद्योगिक वसाहतमधील कंपन्यावरती आधारित असणाऱ्या कंपन्यांना वेळेवर प्रोडक्शन माल न मिळाल्याने त्या कंपन्यांनी या सबंधित माल पुरवणाऱ्या कपन्यांना भरमसाठ डेबिट मारल्यामुळे येथील कंपनीचे अतोनात नुकसान होत होते. रेल्वे ओव्हरब्रीजचे मागील काही वर्षांपासून अनेक वेळा उद्घाटने झाली, परंतु अद्याप परिस्थती ‘जैसे थे’ आहे.

  • टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनास करण्यात आलेली बंदी.
  • काही स्थानिकांचा कंपनी व्यवस्थापनांना दमदाटी करून ठेकेदारी मिळवण्यासाठी चाललेला प्रयत्न
  • विविध मंडळांकडून सण, जयंती, उत्सव आल्यानंतर व्यवस्थापनाकडून अवाजवी वर्गणी घेणे.

स्थानिक ग्रामपंचायती कंपन्यांकडून टॅक्स घेण्यासाठी अग्रेसर, मात्र ग्रामपंचायतीकडून सदर कंपनीना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून त्या संबंधित विभागावर नाराजीचे सूर उमटत आहेत.

औद्योगिक वसाहतमधील कंपन्यांसाठी ‘या’ सुविधांची आवश्यकता आहे – Kanhe Unemployment Problem

  • कंपन्यांना आवश्यक असणारे पाणी पुरवठा योजना होणे अत्यावश्‍यक आहे.
  • लाईटचा लपंडाव नेहमी सुरू असतो, त्या ठिकाणी लाईट सुरळीत होणे अत्यावश्यक.
  • मुख्य रस्त्यापासून कंपन्यांना जाणारे अंतर्गत रस्ते व्यवस्थित असणे गरजेचे आहेत.
  • रस्त्यांपासून कंपनीपर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्टेट लाईट असणे आवश्यक आहे.
  • कंपन्यांच्या अंतर्गत रस्त्यांना सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे.
  • कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पोलिस चौकी कार्यरत असणे आवश्यक आहे.
  • छोटाल्या कंपन्यांमधून अग्नी सुरक्षा नसल्यामुळे या ठिकाणी फायर ब्रिगेडचे स्टेशन असणे गरजेचे आहे.

दरम्यान, या अनुषंगाने सेवा फाउंडेशन व आंदर मावळ्याच्या जनतेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात होते. परिणामी, टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाला मंजुरी मिळाली असून काम प्रगती पथावरती सुरु आहे. कान्हे फाटा येथील रेल्वे ओव्हरब्रिजचा परवानगी मिळालेली आहे. मात्र, या ठिकाणी अध्यापकामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कान्हे फाटा येथील रेल्वे क्रॉसिंग समस्या कायमस्वरूपी अजून तशीच आहे. लोकप्रतिनिधींनी या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ज्या कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत, त्या ठिकाणी नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीला एमआयडीसीचा दर्जा देऊन या ठिकाणी जागा भूसंपादन करून एमआयडीसी सुरू करण्यात यावी.

येथील मुख्य रस्त्यालगत अनेकांनी जमिनी खरेदी करून घेतल्या आहेत. मात्र, त्या ठिकाणी काहीही होत नसल्याने रोजगार व उत्पन्नाचे साधन अडकून पडले आहे. त्यामुळे या भागात एमआयडीसी होणे गरजेचे आहे. यासाठी विधानसभा व राज्यसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे आहे. टाकवे बुद्रुक या ठिकाणी एमआयडीसी सुरू झाल्यास शंभर ते दीडशे गावातील भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.