Mumbai: विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही – उदय सामंत
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
परीक्षा कधी, कशा आणि कोणत्या कालावधीमध्ये घ्याच्या यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव याचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच या संबंधित समितीने केलेल्या शिफारशी राज्यपालांकडे गेल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाली. तर, भविष्यात परीक्षा कशा घेतल्या जातील, याबाबत जो काही निर्णय असेल तो वेळोवेळी अधिकृतरित्या कळविण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.