Ashadhi Wari 2022 : शहराच्या पालखीमार्गावर ड्रोन, ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण करण्यास मनाई; पोलिसांकडून आदेश जारी
एमपीसी न्यूज – दोन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर यंदाचा पालखी सोहळा (Ashadhi Wari 2022) यथोचितपणे पार पडणार आहे. 17 ते 22 जून या कालावधीत देहू गाव आणि आळंदी गाव येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढपूरसाठी मार्गस्थ होणार असून या दरम्यान त्यांचा मुक्काम पिंपरी चिंचवड शहरात असणार आहे. हा सोहळा दरवर्षीप्रमाणेच यंदा सुद्धा जल्लोषात पार पडणार असून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायच्या वतीने मात्र यंदा काही खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. यावर्षी शहराच्या पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण (shooting) करण्यास मनाई करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रतिष्ठान सोहळ्याच्या कालावधीत आळंदी शहरात व देहूगाव येथे लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. यावेळी अथांग पसरलेल्या या जनसागराला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. काही लोक ड्रोनद्वारे किंवा ड्रोनसदृश्य कॅमेराद्वारे छायाचित्रण (shooting) करतात आणि यंदा ही शक्यता नाकारता येणार नाही.
आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2022) येणारे भाविक हे मुख्यतः ग्रामीण भागातील असून त्यांना ड्रोन कॅमेऱ्याविषयी फारसे ज्ञान नाही. अचानक कोणी ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू केले तर भाविकांमध्ये अफवा पसरून गडबड गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयुक्तांनी आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर तसेच देहूगाव येथील विठ्ठल मंदिर व परिसर व संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यश्रेत्रामध्ये 17 ते 22 जून पर्यंत ड्रोनद्वारे किंवा ड्रोन सदृश्य कॅमेराद्वारे पूर्व परवानगीशिवाय छायाचित्रण (shooting) करण्यास मनाई केल्याचे आदेशात म्हटले आहे.
Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी पुणे विभागातून 530 बसेसची सेवा
दरम्यान, पालखीमार्गावर फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाडया लावून जमिनीवर बसून त्यांचा माल विक्री करत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांच्या बसण्यामुळे रस्त्याची रुंदी लहान होऊन पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते, शिवाय गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपला हेतू साध्य करू शकतात त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो असे म्हणून या गांभीर्याने छायाचित्रण करणाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
याच पार्श्वभूमीवर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर तसेच देहूगाव येथील विठ्ठल मंदिर व तसेच आयुक्तालाय हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गावर 17 ते 23 जून पर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाडीवाले यांना बसण्यापासून प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भा. द. वि. संहिता कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांकडून देण्यात आली आहे.