Devendra Fadnavis : भाजपच्या विजयाने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले – फडणवीस

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळाले, काही पिसाळले असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांनी आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवायचा आहे, असे आवाहनही फडणवीस यांनी कार्यकत्यांना केले.

Surrogate Ads: वेलची आणि सोडाच्या नावावर गुटखा आणि दारूची प्रसिद्धी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी!

राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर शनिवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष केला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे.त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली. आपण जिंकल्यानंतर अनेकांचे तोंडचे पाणी पळाले आहे, काही बावचळले आहेत, काही पिसाळले आहेत.निवडणुकीत जे विजयी होतात त्यांनी आनंद साजरा करायचा असतो,त्यांनी उन्माद करायचा नसतो, असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आता विधान परिषदेवर लक्ष

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसदबुध्दी जागृत असेल असा दावा त्यांनी केला.

भाजप व महाविकास आघाडीसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेली राज्यसभेची निवडणूक व तब्बल 9 तास रखडलेली मतदान प्रक्रिया आणि आमदारांच्या मतांचा नंबर्स गेम ही सर्व प्रक्रिया पार पडत अखेर भाजपने बाजी मारत आपले तीनही उमेदवार विजयी करत महाविकास आघाडीला दणदणीत धक्काच दिला, असं म्हणता येईल.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला असून धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. 9 तासांच्या प्रतीक्षेनंतर निकल हाती आला आहे व महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

या निकालाने शिवसेनेसह महाविकास आघाडीचे गणित चुकल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजपने निवडणूक जिंकली आहे, मात्र भाजपला विजय मिळालेला नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला.  भाजपच्या विजयाने अनेकांच्या तोंडचं पाणी पळलं आहे, असं ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.