BJP : महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृती – योगेश बहल
एमपीसी न्यूज – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका करून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. सुळे यांचे यशस्वी राजकारण पाटील यांना खूपत असल्यानेच त्यांनी ही टीका केली असून महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृतीच आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणावरून भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘घरी जा आणि स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा अशा अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश बहल यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या तीनवेळच्या खासदार आहेत.
महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्त्व म्हणून त्या पुढे आल्या आहेत. त्यांना आतापर्यंत आठवेळा संसदरत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न त्या तळमळीने मांडत असल्याने त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आणि हिच बाब भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना खूपत आली आहे.
एका सुसंस्कृत आणि यशस्वी राजकारणी महिलेवर चंद्रकांत पाटील यांनी खालच्या शब्दात टीका केल्याने भाजपाची मनोवृत्तीच महिलांविरोधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला आहे. महिलांचे राजकारणातील नेतृत्त्व भाजप नेत्यांना मान्य नसल्याचेच यावरून अधोरेखीत होत आहे. एका महिलेच्या हक्काची जागा बळाकावून चंद्रकांत पाटील हे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना महिलांप्रति आदर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही बहल म्हणाले.