Pune News : अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण भागात कलम 144
एमपीसी न्यूज – त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा याठिकाणी बंदला हिंसक वळण लागले व हिंसाचार झाला. यापार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आज (रविवार, दि.14) ते शनिवार (दि.20) पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत आज आदेश निर्गमित केला आहे.
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटक सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. आजपासून सात दिवस हे निर्बंध पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लागू राहतील.
प्रतिबंधात्मक निर्बंध अंतर्गत खालील गोष्टींना मज्जाव करण्यात आला आहे.
- सोशल मिडियाच्या माध्यमातून जातीय तणाव निर्माण करणा-या गोष्टी पसरवणे
- सोशल मिडियावर अक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास अॅडमिनची जबाबदारी असेल
- समाज माध्यमांवर अफवा / चुकीची माहिती पसरवणे
- पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, तसेच, शस्त्र, लाठी/ काठी बाळगणे
- जातीय तणाव निर्माण करणारे बॅनर लावणे किंवा घोषणा देणे
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधित भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत कारवाईस पात्र असेल, असे आदेशात म्हटले आहे.