Devendra Fadnavis : बाबरी मशीद आम्ही पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता

एमपीसी न्यूज : मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टिमेटम दिल्यावर तुम्ही घाबरलात आणि म्हणे बाबरी मशिदाचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आम्ही तिथे होतो. शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता. आमच्या 32 नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मी स्वतः तेथे उपस्थित होतो. बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये 18 दिवस होतो, असे सांगत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काही जणांना वाटते, ते म्हणजेच महाराष्ट्र आहे, त्यांचा अपमान, मान-सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा मान-सन्मान, अवमान झाला. असे अजिबात नाही. महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या लोकांनी हा महाराष्ट्र घडवला आहे, समृद्ध केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच 14 मे रोजी पोलखोल सभा घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

हिंदुत्वही आचरण पद्धती आहे, असे सांगतानाच तुमचे सवंगडी जेलमध्ये जातात आणि तरीही ते पदावर असतात, अशावेळी महाराष्ट्राची देशात बदनामी होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असे सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले.

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्यांचे श्रेय कधीही भाजपने घेतले नाही. तेथे उपस्थित असणारे सर्व रामसेवक, रामभक्त होते. कारसेवक होते. तत्कालीन सरकारनेही कारसेवक घटनास्थळी असण्याचा उल्लेख केला आहे. प्रभू श्रीरामांसाठी लाखो लोकांनी संघर्ष केला. आम्ही प्रसिद्धी घेणारे नाही, तर अनुशासन पाळणारे लोकं आहोत. मात्र, राम जन्माला आले होते का, असा प्रश्न विचारण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या बाजूने एकदा सांगून टाका, अशी खोचक टिपण्णी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.