Crime News : पत्नीच्या प्रियकरानेच केला त्याचा खून, पुण्यातील त्या तरुणाच्या खुनाची उकल
एमपीसी न्यूज – पुण्यातील चंदननगर परिसरात एका कचरावेचक तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या तरुणाच्या पत्नीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच त्याचा खून केला. टीव्हीवर क्राईम सिरीयल पाहून त्याने हा सर्व कट रचला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी संतोष सत्यवान शिंदे (वय 28, रा. कर्नाटक, मुळ. कान्हापुरी, जि.सोलापूर) व संग्राम उर्फ बाबू राजू बामणे (रा. मु. पो. कान्हापुरी, ता. पंढरपुर जि.सोलापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.अक्षय प्रकाश भिसे (वय 25) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.21 ऑगस्ट रोजी पहाटे अक्षयचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा कचरा वेचण्याचे काम करत होता.तो कुणाच्या अध्यात ना मध्यात असल्याने त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. गुन्हे शाखेचे पोलीसही या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले व त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली.त्यातून पोलीस सीसीटीव्हीनुसार थेट सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी शहरात पोहचले.तर, दुसरीकडे संशयिताची माहिती नातेवाईकांकडून देखील मिळाली होती.त्यानुसार, मुख्य आरोपीसोबत आलेला मित्र संग्राम उर्फ बाबू याला पकडले.त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर संतोष हा कर्नाटकमधील भालकी गावात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी गावात जाऊन त्याला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी संतोष याचे अक्षयच्या पत्नीबरोबर लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. लग्नानंतरही तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मात्र ती त्याला टाळत होती. याचाच राग आरोपी संतोषच्या मनात होता. त्यामुळे संतोष अक्षय अडचणीचा ठरत होता. त्यामुळे त्याचा कायमच काटा काढण्यासाठी शिंदे याने त्याचा साथीदार बामणे यांच्या मदतीने कट रचला. मात्र, खून करताना कोणतेही पुरावे सापडू नये यासाठी आरोपीने कर्नाटकातून एक दुचाकी चोरली तर एक पिस्तूलही मिळवले. त्यानुसार त्यांनी अक्षय याच्यावर पहाटे गोळ्या झाडून त्याचा खून केला.
दरम्यान अक्षयचा खून करण्यासाठी आरोपी संतोषने मागील काही महिन्यांपासून कट रचत होता. यासाठी त्यांनी टीव्हीवरील क्राइम मालिका देखील पाहिल्या. खून करण्यासाठी तो जेव्हा पुण्यात आला तेव्हा त्याने वेगळे कपडे घातले होते. पुण्यात येताच त्याने कपडे बदलले. खून करून परत जाताना देखील पुणे सोडताच त्याने पुन्हा दुसरे कपडे घातले होते. पण, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.