Chinchwad News : रेल्वे स्टेशन लगतच्या नागरिकांचे अगोदर पुनर्वसन करा – मीनल यादव
एमपीसी न्यूज – आनंदनगर ,साईबाबानगर , चिंचवड स्टेशन येथील रेल्वे स्टेशन लगतच्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने घरांवर कारवाई करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. महापालिकेचे वतीने या सर्व लोकांचे अगोदर पुनर्वसन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल यादव, शिवसेना विभागप्रमुख के. .एम. रेड्डी यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिंचवड स्टेशन, आनंदनगर मधील नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या नोटिसा प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. असुरक्षिततेची परिस्थिती निर्माण झाली. आम्ही या वसाहतीमध्ये अनेक वर्षांपासून राहत आहोत. संसार येथे उभे राहिले आहेत. इथेच आम्ही लहानाचे मोठे झालो. उपजिवीकेचे साधन इथेच आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अचानक हे सर्व सोडून आम्ही इतर ठिकाणी जाऊ शकत नाही अशी नागरिकांची भावना आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने घर खरेदी करु शकले नाहीत. भाड्याच्या खोलीतही राहू शकत नाहीत. कोरोना सारख्या महामारीतून आता थोडेफार सावरु लागले होतो. त्यातच रेल्वे प्रशासनाकडून घरांवरील कारवाईच्या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने अगोदर पुनर्वसन करावे. स्वत:च्या मालकीचे घर द्यावे. त्यानंतरच रेल्वे प्रशासनामार्फत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.