Maval Crime News : कवडीमोल भावात जमिनी विकण्यासाठी शेतक-यांना धमकी
एमपीसी न्यूज – शेतक-यांनी कवडीमोल भावात जमिनी विकण्यासाठी दोघांनी आठ शेतक-यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी शेतक-यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत कैफियत मांडली आहे.
चंद्रकांत येवले, संदीप येवले, बबन येवले, सोनाबाई थोरवे, लता सावंत, शांताबाई सातकर, संजय काळोखे आणि रवींद्र काळोखे यांना शांताराम लक्ष्मण काजळे आणि दिलीप बबन शिंदे हे धमकी देत असल्याचे शेतक-यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
रवींद्र काळोखे यांनी तक्रार दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी आणि सात शेतकरी दहशतीच्या वातावरणात जगत आहोत. आमच्या उपजीविकेचे साधन शेती आहे. शेतीकामासाठी आम्हाला रोज शेतात जावे लागते. मात्र स्थानिक गुंड शांताराम काजळे आणि त्यांचा सहकारी दिलीप शिंदे हे रोज शेतीजवळ येऊन काळोखे आणि अन्य शेतक-यांना धमकावतात.
हात पाय तोडून टाकण्याची धमकी देत आमच्या शेतजमिनी कवडीमोल भावाने त्यांच्या नावावर करून देण्यास सांगतात. आम्ही कमी किमतीत जमिनी विकण्याचा व्यवहार करण्यासाठी ते दबाव आणत आहेत. शेतक-यांच्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका असून त्यांचे रक्षण करण्याची तसेच संबंधीतांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी काळोखे यांनी केली आहे.