Pune Crime News : धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून हाॅटेल मालकाने भिकाऱ्यांवर टाकलं उकळतं पाणी, तिघांचा तडफडून मृत्यू
एमपीसी न्यूज – समाजात ‘भिकारी’ ही संकल्पना नकोशी वाटणाऱ्यांची आकडेवारी मोठी आहे. त्यांना तिरस्काराने वागणूक देत त्यांना बाजूला लोटण्याचे प्रकार आजूबाजूला वारंवार घडलेले पाहायला मिळतात, तर कधीतरी त्यांची दया येऊन त्यांना मायेने घास भरवणारे सुद्धा दिसतात. परंतु, पुण्यात एका हाॅटेल मालकाने क्रुरतेची सीमा पार करत हाॅटेलच्या ओसरीवर विसावा घेणाऱ्या तीन भिकाऱ्यांना अद्दल घडावी यासाठी त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं, या घटनेत तीनही भिकाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या धक्कादायक कृत्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सासवड परिसरात पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप त्यांचे हाॅटेल आहे. 23 मे रोजी जगताप यांनी तीन भिकाऱ्यांना त्यांच्या हाॅटेलच्या ओसरीवर तीन भिकाऱ्यांना बसलेलं पाहिलं. सारखंच ओसरीवर येऊन बसतात, ऐकत नाही म्हणून जगताप यांनी राग मनात धरून तीनही भिकाऱ्यांना काठीने मारहाण केली. मारहाणीने निपचित पडलेले तिन्ही भिकारी अजून का उठून निघून का जात नाहीत या विचाराने पप्पू जगताप यांनी क्रुरतेची सीमा ओलांडत त्यांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं.
या घटनेत तिन्ही भिक्षेकरी भाजून निघाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून अगदी हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असून सुद्धा या घटनेची तात्काळ दखल घेण्यात आली नाही. दरम्यान या घटनेचे कळताच पुणे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.