Alandi Crime News : दारू पिताना झालेल्या भांडणातून एकाचा गळा दाबून खून; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या भांडणातून इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

माधव अतरूषी साबळे (वय 30, मूळ रा. मु. पो. जांब अंध, ता. सेनगाव, जि. हिंगोली), सुधाकर ऊर्फ बंटी बबन वाघमारे (वय 30, मूळ रा. हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्‍वर पुंडलिक शिंदे (वय 56, मूळ रा. मु. पो. हाडूलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गणेश कळंके यांनी सोमवारी (दि.9) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान इंद्रायणी घाटाजवळ आळंदी येथे एकजण बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला पोलिसांनी उपचाराकरिता पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

शवविच्छेदन अहवालमध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशी केली असता मयताचे नाव दिपक असल्याचे समजले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून मयत दीपकचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.