Pune News : पती चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीसी न्यूज : पती आणि सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय आणि इतर त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जांभुळवाडी परिसरात ही घटना घडली. पोलीसांनी याप्रकरणी पतीसह तिघांना अटक केली आहे. सिमा सतीश रेणुसे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी पती सतीश माखाजी रेणुसे (वय 34), संतोष माखाजी रेणुसे (वय 40) यांच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याबाबत सिमा यांचा भाऊ जय मळेकर (वय 19) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सीमा आणि आरोपी सतीश यांचा 2014 साली विवाह झाला होता. सिमा मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. जांभुळवाडी परिसरात ते वास्तव्यास होते. यादरम्यान, पती व इतरांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत व कौटुंबिक कारणावरून मानसिक व शारिरीक छळ केला. त्यांना सतत टोचून बोलले जात होते.
या त्रासाला कंटाळून सिमा यांनी 26 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर जय यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत तिघांना पोलीसांनी तत्काळ अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर हे करत आहेत.